गझल - रंग बेरंग
करतात हे ऋतूही बघ राग राग आता
हे सूर्य चंद्र तारे सारे महाग आता
एकी कुठे दिसेना, का रंग वेगळे हे
का ढंग भावनांचा झाला कजाग आता
हे हाल पाहवेना झाले किती फुलांचे
गेले गळून सारे, सारे पराग आता
ही आगही जळेना, विझले चिराग सारे
येईल का उद्याला वेळीच जाग आता
ना राहिली नदीला ती ओढ सागराची
अन् दाखवी किनारा खोटाच त्याग आता
का रंग होत गेला बेरंग या धरेचा
रंगीत राहिला ना कुठलाच भाग आता
पाहू कसे कुण्याही दुर्दु:ख वंचितांचे
का लावला सुखाने त्याला सुराग आता
उरला असा कितीसा हा काळ जीवनाचा
सोडून जायचे का काशी प्रयाग आता
चंदना सोमाणी ©®

No comments:
Post a Comment