Followers

Wednesday, 28 February 2024

मराठी गझल - दुःखाची खळगी

गझल - दुःखाची खळगी

मी दुःखाची खळगी केली 
अन् पोटाशी सलगी केली

मला तरी हे कुठे समजले
पाव्याची का हलगी केली

नवा रंग नात्यास मिळाला
सून नव्हे तर मुलगी केली

कुणीच नव्हते ऐकत तेव्हा
मैत्रीसुद्धा अडगी केली

कोपऱ्यात तर भरून होती
कुणी रिकामी कणगी केली

पुन्हा एकदा आग लावली 
पुन्हा एकदा ठिणगी केली

चंदना सोमाणी ©®

Monday, 19 February 2024

मराठी गझल - शिवाजी

गझल - शिवाजी 

अंधारावर मात शिवाजी..
एक नवी सुरवात शिवाजी..

उंचावरचा चंद्र सांगतो..
जिती जागती रात शिवाजी..

मावळचा हा गडी रांगडा..
मानत नाही जात शिवाजी..

शत्रूला हमखास भेटतो..
प्रत्येकाच्या आत शिवाजी..

सह्याद्रीच्या कडेकपारी..
दिशादिशांना ज्ञात शिवाजी..

भोळ्याभाळ्या रयतेसाठी..
पाठीवरचा हात शिवाजी..

स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती..
'अरमानोकी बात' शिवाजी..

इतिहासाच्या पानोपानी..
पुन्हा पुन्हा लिहितात शिवाजी..

असाल जेथे दिसेल माझा..
या साऱ्या विश्वात शिवाजी..

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल - आरसा आणि क्षणाक्षणाला

पाऱ्याजैसी तरल संवेदना जपणाऱ्या गझलकारा - चंदना सोमाणी 
गझल रसग्रहण - प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

आज आपण भेटूया प्रसिद्ध गझलकारा चंदना सोमाणी यांच्या गझलांना. चंदना सोमाणी या गेल्या अनेक वर्षांपासून गझल लेखन
करीत आहेत. त्यांनी विपुल कविता लेखनही केले आहे. विविध
दैनिकांच्या पुरवण्या, मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी ललित लेखनही केले आहे. 

सुखदुःखाच्या वळणावर हा ललित लेखसंग्रह, दरवळ रातराणी हा काव्यसंग्रह आणि चंदनाची फुले हा गझल – कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.. शब्दगंध चंदनाचा हे पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. 

सध्या त्या पुणे येथे स्थायिक आहेत. तशा त्या मूळच्या ही पुण्याच्या आहेत. सोमनाथ सोमाणी यांच्याशी त्या १४ जून १९९३ रोजी विवाहबद्ध झाल्या आहेत. 

त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशन व सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात त्यांना प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत वक्ते आणि संपादक कुमार सप्तर्षी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते साहित्य गौरव संमेलनात त्यांना विशेष गौरवान्वित करण्यात आले. आहे. अनेक मुशायऱ्यातून त्यांनी गझल पेश केल्या आहेत.

गझल म्हणाली मला चंदना
तुझ्यात आहे निवास माझा

गझलेवर निःस्सीम प्रेम करणाऱ्या चंदनाजींच्या अनेक गझल गायत्री गायकवाड या गायिकेने गायल्या आहेत. डॉ. आश्विन जावडेकर यांनीही त्यांच्या दोन गझलना चाली लावून त्या पेश केल्या आहेत. संकेत नागपूरकर यांनी चंदनाजींच्या अनेक रचना संगीतबद्ध करून मैफलीत तसेच नागपूर आकाशवाणीवरून देखील पेश केल्या आहेत.

अनेक फेसबुक पेजवरून त्यांचे लाइव्ह सादरीकरणही झाले आहे. अनेक मुशायऱ्यांतून त्यांच्या गझलना चांगली दाद मिळते. 

चंदनाजी एका गझलेत म्हणतात, 

नुसता नुसता होतो गुंता
सोडत बसतो जो तो गुंता

आयुष्याचे होता जाळे
वाढत जातो तो तो गुंता

नात्यांमध्ये केला कोणी
गुंता गुंता हो... तो गुंता 

हा जो आयुष्याचा गुंता आहे तो सोडवत बसणे तसे प्रत्येकाला भाग असते. अनेकदा आपणच या गुंत्यात गुंतत राहतो. तरीदेखील सुरेश भटसाहेब म्हणतात तसे, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा.... 

सगळ्या गुंत्यात गुंतलो तरीदेखील या गुंत्यांतून मोकळे होऊन आपला पाय सोडवून घेतला पाहिजे 

आयुष्य म्हणजे तरी काय असतं. एक प्रकारचा गुंताच की... मग नुसता नुसता होतो गुंता म्हणायची पाळी येते. आता आयुष्यात असा गुंता आलाच तर तो सोडविण्यासाठी आपल्यालाच धडपड करावी लागते. तो गुंता सोडवत बसावेच लागते प्रत्येकाला. अनेकदा नात्यांमध्ये देखील गुंता निर्माण होतो. या गुंत्यामुळे नाते कमकुवत होऊ शकते. अनेक जोडप्यांची नाती अशा गुंत्यांमुळे तुटून गेलेली असली तरी चंदनाताई म्हणतात, हा गुंता सोडविणे आवश्यक आणि भागही असते. तरच जीवन सुखी होईल. 

त्यांची एक गझल विलक्षण आहे. त्या म्हणतात, 

का असा पारा उडाला स्वैर झाला आरसा
गैर मी नाही तरीही गैर झाला आरसा

आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब असणारी ही गझल. प्रत्येकाकडे असलेल्या आरशाच्या पाठीमागे पारा असतो. केवळ काचेतून प्रतिबिंब दिसणार नाही. परंतु अनेकदा हा पारा उडून जातो आणि आरसादेखील स्वैर वागू लागतो. पारा उडालेल्या आरशात आपले प्रतिबिंब पाहू नये असे म्हणतात. कारण पारा उडालेल्या आरशात आपणही भग्न भग्न झालेले दिसतो. आपण नसून पारा उडालेल्या आरशातील तो किंवा ती दुसरेच कोणी असावे, असा भास होतो. आपलेपणा आणि परकेपणा हे दोन्ही आपल्या आयुष्याला घट्ट धरून असलेले घटक आहेत. मग या आरशाला एखाद्याचा चेहरा वैरी वाटतो. परंतु जेव्हा द्वेषाची भावना मिटते त्यावेळी मात्र एखाद्या निर्वैर ऋषीसारखा चेहराही निर्वैर होतो. आपण त्या आरशांत एखाद्या शांत वेळी आणि आपले मन स्थिर असताना डोकावून पाहिले असता त्या आरशातून आपण अंतरातील वेदनांची सफर करून येतो. (इथे त्यांनी सैर हा हिंदी- उर्दू शब्द वापरला आहे. त्यामुळे त्या शेराची नजाकत आणखी वाढली आहे. 

का असा पारा उडाला स्वैर झाला आरसा
गैर मी नाही तरीही गैर झाला आरसा

आपलेपरकेपणाचा भाव जर होता खरा 
मग कुणाच्या चेहऱ्याचा... वैर झाला आरसा

आसवे होती खुळी ती, जी न झाली मोकळी 
झाकुनी डोळे स्वतःचे गैर झाला आरसा

छान झाले द्वेष मिटला मोकळा झाला ऋतू 
पाहुनी आता मला निर्वैर झाला आरसा

मीच माझ्या आत जेव्हा पाहिले डोकावुनी 
अंतरीच्या वेदनांची सैर झाला आरसा

चंदना सोमाणी ©®

अंधारावर मात शिवाजी ही गझल शिवचरित्र सांगतानाच जीवनाचे आगळे वेगळे दर्शनही घडवते. खरे तर इतिहास पुरुषांच्या विजयश्रीचे पोवाडे असतात. परंतु गझलेसारख्या नाजूक तरल आणि प्रणयरंगी रंगलेल्या काव्यप्रकारातही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती सांगता येते हे चंदनाताईंनी दाखवून दिले आहे. 

त्यांच्या एका गझलेतील शेरातही अध्यात्माची झलक दिसते. 

राधा राधा म्हणता म्हणता शामच हरवत गेला
पावरीत मग कोण फुंकते कुठले विरह तराणे

राधा आणि श्याम काही वेगळे नसतात. परंतु राधेश्याम असे म्हटल्यावरच कृष्णाची ओळख पटते. तो राधेशी इतका एकरूप झाला आहे तर मग पावरीत (इथे पावा किंवा बासरीसाठी पावरी हा शब्द त्यांनी वापरला आहे.) पावा हा पुल्लिंगी शब्द तर पावरी (ती पावरी) स्त्रीलिंगी शब्द आहे. या शब्दांतूनदेखील चंदनाताईंनी बासरी आणि कान्हा, राधा आणि कृष्णांचे अद्वैत उलगडून दाखवले आहे. 

त्यांची वेडावतो मनाला ही गझल मनाला भुरळ घालणारी आहे. चंदनाताईंनी या गझलांचे फोटो दिल्याने विश्लेषणासाठी प्रत्येक शेर घेतला असला तरी एकत्र पूर्ण गझल देत नाही. त्या फोटोत तो तो शेर वाचणे गरजेचे आहे. 

वारा हे चंचलतेचे प्रतीक आहे. शिवाय वायू आहे म्हणून श्वास चालतो. देहामध्ये वारा वाहत असतो. तो कधी चैतन्याच्या सळसळीच्या रुपात तर कधी मनाला चंचलपणा देणारा हा वारा. आपले मनदेखील या वाऱ्याप्रमाणेच अस्थिर व चंचल आहे. क्षणाक्षणाला मनाचा प्रवास सुरू असतो. त्यांनी मनाला वाऱ्याची उपमा दिली आहे. 

एका शेरात त्या म्हणतात पावसाचा काही भरवसा नसतो. तो कधी रिमझिम, कधी वादळी आवर्तने घेत, तर काही वेळेला झोडपणाऱ्या गारांच्या रूपाने पडत असतो. प्रेम आणि पावसाची त्या तुलना करतात. पाऊस जसा बेभरवशाचा तसाच प्रियकर (क्वचित प्रेयसीदेखील) चंचल बनून आपल्याला गारांप्रमाणे झोडपून काढते. 

हा शेरदेखील महत्त्वाचा आहे. त्या म्हणतात. इथे पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी आपण स्वातंत्र्याचे गुणगान गात असतो. परंतु प्रसंगी सत्याग्रह, आंदोलने मोठ्या संख्येने होतात. अनेकदा ती स्वातंत्र्यासाठी मग ती मतं स्वातंत्र्य असो की विचारस्वातंत्र्य असो ते दडपण्यासाठी राजसत्ते तुला मोठ्या प्रमाणात कारागृहे (तुरुंग – कारा) का बांधावी लागतात असा सवाल त्या करतात. 

त्यांचे आरशावर प्रचंड प्रेम आहे. अनेक गझलांतून आणि शेरांतून हमखास आरसा प्रकटतो. वेडावतो मनाला या गझलेतही त्याचे प्रत्यंतर येते. 

का आरशास भासे चर्या अनोळखीशी
उडतो अताअताशा पारा क्षणाक्षणाला 

अक्षरांची द्विरुक्ती किंवा शब्दांची द्विरुक्ती त्यांच्या अनेक शेरात वाचावयास मिळते. याच गझलेत राजकारणी (चारा घोटाळा) डोकावतो.

वेडावतो मनाला वारा क्षणाक्षणाला 
नसतो मनास तेव्हा थारा क्षणाक्षणाला

प्रेमात पावसाचा असतो कुठे भरवसा 
पडतात त्यात काही गारा क्षणाक्षणाला

स्वातंत्र्यगान जर का ओठांवरी तुझ्या तर
का बांधतोस मग तू कारा क्षणाक्षणाला

का आरशास भासे चर्या अनोळखीशी 
उडतो अता अताशा पारा क्षणाक्षणाला

समजून घेतली मी आत्ताच लोकशाही 
खातात लोक तेही चारा क्षणाक्षणाला

जर भेटलाच आहे सहवास सागराचा 
होतोच मग किनारा खारा क्षणाक्षणाला

चंदना सोमाणी ©

_--------+++ 

आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या काही गझला व शेरांचे अवलोकन करून त्यांना मी ही भेट दिली आहे. आपण वाचकांनाही ती निश्चित आवडेल. वाचून अभिप्राय द्यालच. 

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९) 
ताळगाव, गोवा.

Saturday, 17 February 2024

मराठी गझल - धूसर धूसर नाती

गझल - धूसर धूसर नाती 

धूसर धूसर रस्ते सगळे धूसर धूसर नाती
ओल्या हिरव्या जखमा आणिक काही भिजल्या राती

दोन क्षणांचे दोन किनारे काय म्हणावे याला
या जन्माची त्या जन्माशी नाळ जोडते माती

कोण कुणास्तव इथे जन्मलो काही कळले नाही
भिजून सुध्दा पुन्हा राहिल्या इथे कोरड्या वाती

पान फुलांचा बहर कोवळा तरी वाकते फांदी
सांभाळुन घे मला सांगतो हात दिलेला हाती

आकाशाशी हितगुज करते क्षितिजावरती धरती
जणू सांगती एकामेका तू माझा सांगाती

चंदना सोमाणी ©®

Thursday, 1 February 2024

चंदनाची फुले - रसग्रहण 13

मनाच्या कोऱ्या पानावर...


रसग्रहण - आशा पांडे, नागपूर 

जेव्हा पहिल्या जेष्ठ गझलकारा आपल्या गझल_कवितासंग्रह "चंदनाची फुले" यावर लिहितात तेव्हा आभार मानायला शब्द उरतातच कुठे... लेख वाचताना संपूर्ण पुस्तकातील पानं डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागली... आशाताई तुमचा अभिप्राय लेखणीस अजून बळ देईल हे निश्चित....🙏🙏

माणसाचे हे जग बहुरूपी, बहुरंगी आहे तसेच कवितेचे ही जग बहुरूपी, बहुरंगी आहे. सृष्टीच्या प्रत्येक कणाशी कवितेचे नाते असते. जीवनाच्या प्रत्येक क्षणाशी कविता जोडलेली असते. संवेदनशील मनांना ती जाणवते. त्यांच्या सोबत असते. त्यांना साथ देते.
माणसाला कवेत घेण्याचे सामर्थ्य कवितेत आहे व दुखऱ्या मनावर फुंकर घालण्याचा हळुवारपणाही कवितेत आहे. सृष्टीची विविधता जपण्याचे कौशल्य कवितेत आहे. या दुनियेतल्या प्रत्येक फुलांचे रूप वेगळे, रंग वेगळा, गंधही वेगळा, रुपाची मोहिनी वेगळी, रंगाची जादू वेगळी आणि गंधाचा अलवार स्पर्श वेगळा. तसेच प्रत्येक कवीची कविता वेगळी, अगदी एकाच कवीचीही प्रत्येक कविता वेगळी हे सत्य प्रकर्षाने जाणवते चंदना सोमाणी या पुण्याच्या कवियित्रीच्या "चंदनाची फुले" या कवितासंग्रहात.
काही कविता चांदण्यात जन्माला आल्या आहेत. चंदेरी झाल्या आहेत. त्या चंद्रप्रकाशातही फुलांवर दव थेंबाचे मोती चमकतात. कल्पना आणि वास्तवाचे झिलमिल नाते उलगडते. मनाच्या कोऱ्या पानावर चांदणे कोरत जाणारी ही कविता निखळणाऱ्या तारकांना दृष्टीआड करू शकत नाही. कविता कल्पनेला वास्तवात आणण्याचे भावसामर्थ्य देते. आत्मविश्वास देते तसेच ती कटू- कठोर वास्तवाला कल्पनेसारखा तरल आणि तलम बनवण्याचे मार्दव, ऋजूता आणि सौंदर्याचा ध्यास देते. सत्याच्या शिवात्म रूपाचा सुंदर अविष्कार म्हणजे कविता. प्रत्येक जीवन दर्पणात कवितेचे प्रतिबिंब असावेत ते असे. कविता मनोवृत्तीचे उन्नयन करते. उंच भरारी घेणाऱ्या पाखरांच्या पंखांना बळ देण्याचे कामही कविता करते आणि पाखराला घरटा पर्यंत सुरक्षित आणण्याचे कर्तव्यही कविता करते. 
पावले पुढे-मागे होतात. फेरबदल होतात. अखेरीस गंतव्याप्रत नेते ती कविता. ही कविता अशीच आहे. मोहाच्या क्षणात भुलता मनी कातर -कातर होते. ते कातर मन क्षणात सावरते. जाणीव होते. सोपे सोपे म्हणता-म्हणता मागचे सारे खडतर होते. या खडतर मार्गावर आणखी दोन पावले सोबत असावी, असे वाटते. कुठून तरी साथ यावी किंवा आपल्या हाकेला प्रतिसाद यावा, या झुलत्या क्षणांना घेऊनच येते नशीब, ज्यामुळे साद-प्रतिसाद केवळ एक आभास ठरतो. कितीही यत्न केले तरी झिजण्याशिवाय चंदनाला गंध नाही हे अकाट्य सत्य  समोर उभे ठाकते.
वास्तवाच्या कठोर भूमीवर कारुण्य भावाने देह झिजल्या शिवाय कीर्तीगंध सुखाचा सुगंध लाभत नाही. जीवनाचा हा अर्थ शिकवणारी ही कविता शाश्वताशी नाते जोडते. आत्मभान जागे करणारी कविताच असते. आत्माभिमानही कविताच जागवते. मानवी मनातल्या सगळ्या सुप्रवृत्तींना जाग आणण्याचे काम कविताच करते. चंदना सोमाणी ची कविताच सांगते सुखाची सोपी संकल्पना. "माणूस माणसाचा" या कवितेतून व कविताच खंतावतेदेखील, जेव्हा ही सोपी संकल्पना कुणाला कळत नाही 'दुःखाचे कारण उमजते' या कवितेतून आपल्याच मनाच्या चक्रव्यूहात आपण अडकलेले असतो तेव्हा चक्रव्यूह कसा भेदायचा हे ती सांगते, कारण ती निर्मितीचा धर्म पाळते.
कविता भावाभिव्यक्ती असली तरी रांगोळी प्रमाणे  रेषेत राहणारी असते. बिंदू- बिंदू जोडणारी असते. सगळ्या रंगाची संगती साधून एक नयनमनोहर रंग तयार करते ती कविता. कविता माणसाला माणुसकीचे दान देते. महान बनवते ती कविता. कोमेजणारी फुले अंधाराच्या पदरात लपवून उमललेल्या फुलांनी झाडांना नटवते ती कविता. कविता जीवनाची शक्ती असते. कोसळणाऱ्या जलधारांना ज्या ताकतीने धरणीमाय सोसून घेते त्याच ताकतीने कविता कोसळणार्‍या मनाला झेलून घेते. संवाद साधते. ती मनाला जगाच्या नजरे पलीकडे असलेले अभंग आकाश शोधण्याची प्रेरणा देते. कविता सदा चैतन्यमय ठेवणारी चेतना आहे. शब्दार्थाच्या पलीकडे ती आत्म्याचा अनात्म विलास आहे. त्याग आणि समर्पणाच्या पावलांनी चालणारी, कर्तव्य निष्ठा आणि विश्वास श्वासात जपणारी, भूतकाळाला वर्तमानाचा हात देऊन भविष्याकडे नेणारी, मानवी मनाला दैवी वरदानात लाभलेली ही कविता विद्रूपतेच्या प्रांतात शिरू नये.  बीभत्स, विदारक होऊ नये. नैराश्याची दुसर छाया या  चारुगात्रीवर पडू नये. जगाच्या इतिहासात अनेक युगांतरकारी, क्रांती घडवणारी कविताच आहे. तिची हीच शक्ती कवींनी जतन करावी. तिला चिदानंदमयी बनवावी.

आशा पांडे, नागपूर
लेखिका ज्येष्ठ पंचवाषिक कवयित्री, गझलकार व साहित्य बिहार अध्यक्ष आहेत.

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...