रसग्रहण - चंदना सोमाणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,सध्या काय वाचत आहे, मैत्रिणीने फोनवर विचारले.
अगं, ते गझलगंधर्व सुधाकर कदम आहेत ना माझ्या फ्रेंडलिस्ट मधे त्यांचे पुस्तक "फडे मधूर खावया".
काय अगं! गझलकारा ना तू, जरा नीट वाच ना...
अगं पण त्या पुस्तकाचे नाव तर हेच आहे मग मी नीट म्हणजे कसं वाचू ...
विदर्भात जर हेच पुस्तकाचे नाव वाचले तर काय खायला लागेल हे सुज्ञ वाचकांना सांगणे न लगे...
पुस्तकाच्या गमतीशीर नावाचा उलगडा पहिल्याच प्रकरणात झाला तो असा की, लेखकाच्या मित्राला ळ ऐवजी ड उच्चारण्याची सवय होती. त्याचे नावही "फाळके" म्हणजे त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर "फा-ड-के".
लेखकाचे प्रख्यात कवीमित्र कलीम खान साहेबांना कवितेची एक ओळ सुचली मात्र पुढची ओळ काही केल्या सुचेनाच. कवितेचे डोहाळे पुरवता पुरवता प्रत्येक कवीच्या नाकी नऊ येतेच म्हणा त्याचाही प्रत्यय आपल्याला याच पुस्तकात 'जो न देखे रवी' मधे येतोच म्हणा..असो. तर दुसरी ओळ काही केल्या सुचेना. ती ओळ ऐकून व दुसरी ओळ न सुचल्याची यातना पाहून सुधाकर कदमांच्या तबलजींना ती ओळ एक झटक्यात सुचली ती वाचून मात्र कविता रचणे किती सोपे असते याचा प्रत्यय दुसऱ्याच झटक्यात आला...
त्या ओळी आहेत..
"मी काल सहाय्या गेलो समजून तिला एक अबला"...कवी- कलीम खान
"पण हाय तिच्या बापाने माझाच बडवला तबला"..दुसरं कोण ? खुद्द तबलजीच...
अशा कवींच्या जुगलबंदीने हास्याचा स्फोट न झाला तर नवलच..
अशक्त भाषेचा सशक्त वापर कसा करावा याचे पुरेपूर धडे तसेच मातृभाषेला "मदरटांग" हेही म्हटले जाऊ शकते ते ह्याच पुस्तकात... झंपर जळाले म्हणजे नेमके काय जळाले वाचताना हास्याचा कडेलोट नाही झाला तर पुस्तकाचे नावच बदलवून टाकीन...
"तराणा"... नागपूरच्या दैनिक तरूण भारत या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर डावीकडे आलेला हा लेख बाकी खासच आहे. गायक आणि राजकारणी यांची रागदारीतून गुंफण करणे हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे...ते एक गायक-संगीतकारच करू जाणे अर्थातच तो हाडाचा लेखक असणेही गरजेचे आहे...
नेत्यात अभिनेता आणि अभिनेत्यात नेता कसा डोकावतो हे मात्र पुस्तकात वाचूनच याचा आनंद घ्यायला हवा...
जास्त हाव केल्याने पाय गळ्यात येण्याची संभावनाच जास्त असते हे "लक्ष्मी-वेल"ने हास्यकारंजासह दाखवून दिले.
"पर्ण-पुराण" मध्ये विविध पानांचे जीवनातले सांस्कृतिक महत्त्व सांगताना सोबत त्याचा आरोग्याशी असणारा संबंध वजा करून..मावा, गुटखा, तंबाखू यांची त्यात बेरीज करत आयुष्याचे गणित कसे बिघडवत आहे याची खंत लेखकाने व्यक्त केली आहे...
आज मुले आईबापासमोर मद्यपान करून जायला देखील मागे पुढे पाहत नाहीत पण, या पुस्तकात पिताश्रीने पान खाल्यावर खऱ्या अर्थाने कसे तोंड रंगवले हे सांगताना "जनरेशन गॅप" चा फरक अधोरेखित करताना स्वतःवर बेतलेला रंगारंग प्रसंग खूप सुंदररित्या रंगवून सांगितला आहे.
उपरी सजावटीसाठी वापरात येणाऱ्या बेगडाच्या सौंदर्याचे रहस्य, त्याच्या बेगडी पणाचा पर्दाफाश "बेगड" मधून करण्यात आला आहे. त्यातून बुवाबाजी, मुठ मारणे, भानामती यांसारख्या अंधश्रद्धेवर हल्लाबोल करत जळजळीत अंजन घालण्याचे कामही लेखकाच्या लेखणीने हसतखेळत यशस्वीरित्या मांडलेले आहे.
"नाते-खाते-गोते" यात नात्यांचे अकाउंट तर इतके चोख सांभाळले आहे की ते वाचून एखाद्या बॅक अकाउंटंटला देखील इतका चोख येईल की नाही याची शंका मनात डोकावून गेली. हसण्याचा हा चेक बाऊन्स होणार नाही याची खात्री मी देते...
"मोफतलाल" मधला लेखकाला भेटणारा मोफतलाल तर आपल्याला पावलोपावली भेटत असल्याची ग्वाही हे पुस्तक सहज देऊन जाते...
लेखकाला "हम आपके है कौन" पाहून चढलेली धुंदी, आयुष्य म्हणजे तीन तासाचा चित्रपट नव्हे हे कळताच 'दिल के अरमाँ आँसुओमे बह गए' म्हणतच उतरली. शिवाय आपल्या घरात त्या चित्रपटाप्रमाणे खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याच्या नादात बायकोच्या तोंडून बापाचा उद्धार करून घेतला तो निराळाच...
त्यांच्यातील लेखकात गायक-संगीतकार कसा डोकावतो त्याचा उत्कृष्ट नमुना प्रश्न आणि उत्तर मध्ये आपल्याला पाहायला मिळते...
*मग मात्र नको तो स्वर लागल्याने गाणाऱ्याची जशी पंचाईत होते तशी माझी झाली*
*आता मात्र माझे सातही सूर बेसूर झाल्याचे लक्षात आले*
जीवनाकडे नेहमी गांभीर्याने न पाहता त्याचसोबत जर विनोदी अंगाने पाहिले तर जीवन समरसून जगता येईल याचा प्रत्यय पुस्तकातील प्रत्येक प्रकरण देऊन जाते...
पुस्तक वाचताना जीवनाचे तत्वज्ञान मांडणारे वपु तसेच पुलंचा खमंग खुसखुशीतपणा अख्या पुस्तकभर भेटत राहतो. या दोघांच्या लेखणीचा अंश एकत्रितपणे सुधाकर कदमांच्या लेखणीत जाणवत राहतो आणि हो, तुमच्यातील संगीतकारासोबतच तुमच्यातील लेखक जिवंत राहो हीच सदिच्छा आपल्याही नकळत आपले मन देऊन जाते...
'हप्ता पोहचवत' हे पुस्तक वाचण्याचे "सौजन्य" प्रत्येकजण दाखवणार याची खात्री लेखकासह मलाही आहेच त्याबद्दल मी नादच करणार नाही."विषयांतर" सारखेच विषयांतर न करता तुमच्या नव्या पुस्तकाच्या प्रतिक्षेत...
-चंदना सोमाणी © पुणे
●लेखक - सुधाकर कदम ●
प्रकाशक - अक्षर मानव प्रकाशन, पुणे.
किंमत-पोस्टेज खर्चासह २००₹
● पुस्तक घरपोच मिळण्यासाठी
8888858850
9822400390
या क्रमांकावर फोन करून पुस्तक बुक करता येईल.
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.

No comments:
Post a Comment