देव आहे की नाही..? भुत-प्रेत आहे की नाही..? स्वर्ग नर्क हे अस्तित्वात आहेत की या कल्पना..? हे, ते, असे अनेक प्रश्न..???????????????
बापरे मनाला किती प्रश्न पडतात नाही...?
मला नाहीत तर जवळपास सर्वांनाच ही प्रश्न पडतात ज्याची उत्तरे अधांतरीच......
यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण कधी केला का ? किंवा करतो का..?
पण समजा आपल्या हाती असाच प्रश्न उत्तरांचा उहापोह असलेला वैचारिक ग्रंथ हाती आला तर आवडेलच ना वाचायला...?
हो नक्कीच! कुणाला नको आहे शंकांचे निरसन...!
अशाच सर्व मनातील प्रश्नांचा उहापोह करणारे दुकान म्हणजेच लेखक पुष्कराज गावंडे दादांचा वैचारिक ग्रंथ " मी आस्तिक मी नास्तिक "....
सहज, सोपी, ओघवती भाषा शैली तसेच मधेच येणारी सुंदर वर्हाडी भाषा मनाचा ताबा घेत गेली आणि पुस्तकाचा फडशा एका दमात पाडला...
देव आहे तर तो कसा आहे..?
कुठे आहे..?
तो आपल्याला दिसत का नाही...?
अशीच प्रश्ने मलाही नेहमीच पडत, मला पुस्तक वाचायच्या आधी वाटायचे की जगात आपण एक वेडे आहोत की काय पण इथे तर हे सारेच प्रश्न लेखकालाही पडलेले दिसतात. देवाचे अस्तित्व नाकारावे की स्वीकारावे लेखकासोबतच प्रत्येकाला पडलेला प्रश्न...?
देवाला मानावे तर आस्तिक नाही मानावे तर नास्तिक असा हा सामाजिक दृष्टिकोनाचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो यातून लेखकही सुटलेला नाही याचा प्रत्यय आपल्याला वाचताना येतो...
जेव्हा लेखकाचे मित्र लेखकाला नास्तिक, " बेअक्कल हाय लेकाचा" असे हिणवतात...
देवाचे अस्तित्व आपण स्वीकारावे की नाही ह्या स्वतःला उद्भवलेल्या प्रश्नामुळे " मी आस्तिक मी नास्तिक" हे या वैचारिक ग्रंथाचे नाव अगदी समर्पक ठरते...तसेच त्या नावाला साजेसे मुखपृष्ठ व मलपृष्ठावर असणारी दादाची सदरील ग्रंथाला साजेशी छबी...सर्वच उत्तम...!
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने गौतम बुद्धांच्या पासून ते आज पर्यंतच्या भोंदू साधू बाबांपर्यंत बराच वैचारिक उहापोह केलेला दिसून आला...!
हा जरी वैचारिक ग्रंथ असला तरी वाचतांना लेखकाची मिश्किल शैली गंभीरपणा जाणवून देत नाही त्यामुळेच वाचतांना हसे आवरत नाही. प्रकरण 30 आणि 35 प्रकरण वाचतांना हास्याची तर खसखसच पिकते...
इथे लेखकाने अनेक पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे मागताना सर्व देवा- धर्माप्रती संत महात्म्यांचा आदर करून त्यांच्या प्रश्नांमुळे जर कोणाची मने दुखावली गेली असतील तर मोठ्या मनाने माफी देखील मागितली आहे. यात जे प्रश्न लेखकाचे आहेत तेच प्रश्न तुमचे, माझे, सर्वांचेच आहेत. हे प्रश्न कोणी विचारतात तर कोणी मनातच पडताळून पाहतात कारण देवाधर्माविषयी अशा प्रश्नांची कुठे वाच्यता केली तर समाज काय म्हणेल..? हा प्रश्न समोर उभा राहतो...
लेखनातून शेतकऱ्यांविषयीचा कळवळा सुंदररित्या मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत आणि भ्रष्टाचारावरही कोरडे ओढण्यात लेखकाने काहीच कसर ठेवली नाही...
जातीभेद पाळणे चांगले की वाईट यावर लेखक म्हणतो, की माझ्यामते जाती पाळाव्यात पण फक्त उच्चनीच भेदभाव पाळू नये तो वाईट! जाती वा 'आपला समाज' ही गोष्ट तुमच्यासाठी एक संरक्षण आहे. एक कवच आहे. ती तुमची कुंडले आहेत. ती गळून पडली तर तर तुम्ही तगू शकणार नाही. तुमचा कर्ण होईल....
एकंदरीत लेखकाने सदर ग्रंथात सर्व विषयांचा कट्टा-चिट्टा स्पष्ट व समर्पक शब्दात पेलला आहे...
माणूस कितीही नास्तिक असण्याचा आव आणत असला तरी त्याच्या मनात एक कोपरा हा श्रध्देचा असतोच, पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी-परंपराचा पगडा हा मानवी जीवनावर कितीही नाही म्हटले तरी असतोच...एकप्रकारची अनामिक भिती ही त्याठिकाणी असतेच म्हणून जो देवाला मानत नसल्याचे आव आणतो तो देखील देवाला भितो...तसे पाहिले तर देव अस्तित्वात आहे नाही हा विषय लांबच परंतू एक अज्ञात शक्ती असते जिला आपण श्रद्धा असे म्हणतो...
सदरील ग्रंथात मी कुठेही माझं ज्ञान पाजळलेलं नाही, तर मी, माझं अज्ञान प्रकट केलेलं आहे! कुठलाही अहंभाव नसलेलं मलपृष्ठावरील हे वाक्य लेखकाच्या मनाच्या महानतेची खोली सांगून जातं
स्वतः लिहून झाले रिकामे पण आमच्या विचारांचे मात्र चक्र सुरू करून....
शेवटी प्रश्न हे प्रश्नच राहतात...
तसे पाहिले तर एखाद्या पुस्तकाविषयी ही माझी पहिलीच समीक्षा ते घरचा आहेर म्हणजे माझा दादा त्यामुळेच मी समीक्षा करावयास धजले....
तरीही जर चुकून काही अधिक उणे असल्यास माफी असावी
चुक भुल देणे घेणे....
चंदना सोमाणी ©®

No comments:
Post a Comment