Followers

Sunday, 21 July 2024

मराठी गझल आणि रसग्रहण - या मनाचे त्या मनाला


*रसग्रहण*

  *सौ. सविता सामंत*

          *गोवा*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

    चला तर आपण आजच्या रसग्रहणाकडे वळूया!!

     आदरणीय गझलकारा सौ.चंदनाताई सोमाणी यांची व्योमगंगा वृत्तातली एक दमदार गझल आणि तिचे रसगग्रहण यांचा आस्वाद घेऊया!

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *मतला* -0️⃣1️⃣

या मनाचे त्या मनाला सांगताही येत नाही 
खंत ही की पण मनाला कोंडताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

      *मन चिंती ते वैरी न चिंती*

या उक्तीनुसार मानवी मन हे अनाकलनीय आणि गूढ आहे. कधी कधी दोन व्यक्ती खूप जवळचे मित्र असतात.पण काही तात्विक वादांमुळे कटुता निर्माण होते. आता यात दोघांना किंवा कुणा एकट्याला जरी वाटले की आत्ता मला त्याच्याशी बोलायचं आहे.पण मग मनात विचार येतो की वादामुळे आधीच मनात कटुता आहे. मी परत बोलल्याने जर ती कटुता आणखीनच वाढली तर!....असा विचार करून त्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट आपल्या प्रिय व्यक्तीला सांगताही येत नाही.

    एकमेकांना एकमेकांची सवय झालेली असते. दोन मित्र असो  मैत्रिणी असोत वा प्रियकर-प्रेयसी...! छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी बोलण्याची सवय असते. एखादी नविन गोष्ट आवडली.नविन गोष्ट पाहिली तर ती कधी एकदा त्याला किंवा तिला सांगेन अशी मनाची अवस्था होते. आणि मग अशा स्थितीत ती गोष्ट मनात कोंडून ठेवावी लागते.मग मनाची तगमग, मनाची अस्वस्थता वाढते. या मनाच्या अवस्थेत *धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं* ही उक्ती लागू होते. अश्या मनाच्या अवस्थेचं नेमकं वर्णन गझलकारांनी केलं आहे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣2️⃣

जीत होती हार होती काय होते काय सांगू
जिंकणे सोपे खरे तर हारता ही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️

  काही नाती इतकी विलक्षण असतात की काय बोलावं!
एखाद्या गोड नात्यात वाद झाला... किंवा कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही अपरिहार्य कारणाने दुरावा आला,तरी दोघांनाही ते नाते तोडायचे नसते.त्यांचा मन आणि आत्मा एकमेकांशी इतके गुंतलेले असतात की कोणीही त्यांना वेगळे करू शकत नाही. वाद झाला, भांडण झाले तरी कुणी कुणाला दोष देत नाही. दोघेही पुढच्या क्षणाला माघार घ्यायला तयार असतात. इथे स्वतःची हार वा जीत याला  महत्व नसते. दोघेही स्वतः वर दोष घ्यायला तयार असतात. इथे दोघेही दुसरा जिंकावा म्हणून प्रयत्नशील असताना हारणं कठीण आहे.आणि आपण सारेच जाणतो....प्यार में जो हारा वही तो दिल जित लेता है!असंच काहीसं....!
हो ना...!
हा अनुभव या शेरात गझलकारांनी उत्तम रितीने यात मांडला आहे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣3️⃣

कालच्या एका क्षणाला आज मी फिरुनी म्हणाले 
दे परत तो क्षण परंतू मागताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

इक बार वक्त से लम्हा गिरा कहीं....
देखा तो नहीं है....ढुॅंडा तो नहीं है...
पल जो ये जानेवाला है...!
हे आठवलं ना तुम्हांला.....! मलाही हेच आठवलं नेमकं....!
वेळेला पकडून ठेवू शकतो का ...? नाहीच....पण मग गेलेला क्षण फिरुन परत मागून मिळावा एवढी माफक अपेक्षा ठेवू शकतो का....? मुळीच नाही!!

*काल मी माझ्या सर्व मैत्रिणींना भेटले खूप धमाल केली*

*काल सगळे कुटुंबिय एकत्र फिरायला गेलो होतो मस्त गप्पा रंगल्या* 
ही वाक्य ऐकतो आपण, कधी आपणही म्हणतो.
    खूप आनंदाचे, सुखासमाधानाचे क्षण येतात जीवनात!तेव्हा ते आठवून कितीदा तरी आपण पुन्हा आनंदून जातो. तेच क्षण फिरुन परत आपल्याला अनुभवता यावे असं अगदी मनापासून वाटतं. वाटतं ना...! पण ते आनंदी क्षण कुणाकडे मागूनही पुन्हा मिळणार नाहीत. *क्षणापाठोपाठ क्षण येतो, पण आधीचा क्षण हरवून जातो* म्हणून आनंदाच्या क्षणी त्यांचा भरभरून आनंद घ्या.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣4️⃣

दोष मी देऊ कसा माझ्यातल्या बाईपणाला 
आतला आईपणा नाकारताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

     *स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे*

     या उक्तीप्रमाणे एका वाक्यात प्रस्तुत शेराचा आशय आहे. स्त्रीला तिच्या जीवनात अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात.त्यात महत्वाच्या दोन भूमिका म्हणजे पत्नी किंवा प्रेयसी आणि दुसरी आई!  आपल्या सहचराबरोबर पत्नीचं नातं ती सुरूवातीला जेवढे समरसून निभावते तेवढं ती आई झाल्यावर निभावू शकत नाही.माया, जिव्हाळा हा स्त्रीचा स्थायीभाव आहे.आई-बाळाचं नातं जगातील सर्वात नि:स्वार्थी नातं आहे. ज्याला  नऊ महिने उदरात मायेने वाढवलं आहे, तो बाळ हा आईचाच एक भाग आहे.इतके दिवस बाळाशी तिचा मूक संवाद होता. ती आई झाल्यावर तिचं जास्तीत जास्त लक्ष,तिचा ओढा आणि तिचं ममत्व हे साहजिकच बाळाकडे आहे.

    या शेरात गझलकारांनी याची प्रांजळपणे कबुली दिली आहे, की मी एक बाई असले तरी, आईची भूमिका मला नात्याच्या बाबतीत अधिक श्रीमंत करते.  ही भूमिका आता मी अधिक तन्मयतेने निभावते आहे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣5️⃣

थांबलेला क्षण म्हणाला कोण आहे यातला तू
 हा भला की तो भला हे ताडताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

     आनंदाचे,सुखाचे जे प्रसंग   आपल्या जीवनात येतात, कालांतराने त्या रम्य आठवणी बनून मनात घर करतात. कधी निवांत वेळी सारे प्रसंग डोळ्यासमोर तरळतात.किंबहुना त्या गोड आठवणींना उजाळा देणं ही मानवी मनासाठी त्या प्रसंगाइतकंच आनंददायी असतं. त्या सुखाच्या प्रसंगातील नेमका कोणता क्षण मला सुखी करुन गेला...!आधीचा क्षण चांगला होता की नंतरचा चांगला होता याचा शोध घेण्याचा मनाला छंदच जडतो. पण नेमका कोणता क्षण चांगला वाटला हे सापडत नाही.

  आनंदात आणि सुखातही माणसाची तुलना करण्याची सवय काही संपत नाही. मानवी मन सुखाचा पुर्नप्रत्यय आठवणीतून घेत असतं....पण त्यातही अधिक सुखाचा शोध चालू असतो!!

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣6️⃣

संपलेला पर्व इथले जायचे तर जा आता तू 
काळवेड्या पावलांना रोखताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

    सण किंवा उत्सव पर्व हे आपल्यासाठी आनंदाने क्षण घेऊन येतात. पण आनंद आणि सुख घेऊन येणाऱ्या क्षणांनाही आपण उत्सव पर्व का म्हणू नये? आनंद ओसरल्यावर आनंदी क्षण निघून गेले तरी मन मात्र त्या क्षणांभोवती रेंगाळत असतं.

      पण हे झालं सामान्य माणसांविषयी. विशिष्ट ध्येयाने प्रेरीत माणसे त्या क्षणांमध्ये काही क्षण रमतात. पुन्हा आपल्या ध्येयपथावर चालायला सुरुवात करतात.

      काळाची पावले ओळखून काळाच्या किनाऱ्यावर आपलं नाव कोरणारी माणसं, कितीही आनंदाचे क्षण असले तरी भुलून जात नाही. त्यांचे प्रयत्न सतत आपल्या ध्येयाच्या दिशेने सुरूच असतात. जगाच्या कल्याणासाठी आगळं वेगळं काम करत असतात. लोकहिताचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सैनिक, शास्त्रज्ञ, नर्स, डाॅक्टर, समाजसेवक अंतराळवीर.....ही काही उदाहरणे आहेत.अशा अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असतात.....अविरतपणे.....न थांबता!!

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* - 0️⃣7️⃣

घाव नव्हते ते नवे जे देत आला तू सदोदित 
वेदना जख्मी मनाच्या मोजता ही येत नाही

 〰️〰️〰️〰️〰️〰️

    तुला कधीतरी कळेल का...तुझ्या बोलण्याने माझ्या मनावर किती घाव करत असतोस. मी तुझ्याकडून नेहमीच प्रेमाची आणि सरळ बोलण्याची साधी अपेक्षा करत आले. पण तुला मात्र माझी एवढी माफक अपेक्षा पूर्ण करता आली नाही.

     तू सदोदीत उपेक्षा करत आलास. तुझ्या निष्काळजी वागण्या बोलण्याने मनावर रोज नविन घाव करत आलास. आता या मनावर जखमांचे अनेक चरे पडले आहेत.हे काही आजचं नाही.हे तुझं रोजचंच आहे. आता मनाला वेदनेची आणि जखमांची इतकी सवय झाली आहेकी त्यांची मोजदाद करणेही मला कठीण झाले आहे.

       सहजीवनात पती -पत्नी दोघांनी एकमेकांचा आदर करावा.एकमेकांना वेळ द्यावा.भावना जाणून घ्यावा.मतांचा आदर करावा.या सर्वांच्याच अपेक्षा असतात.

    आजची स्त्री घरदार,नोकरी-धंदा, मुलांचं संगोपन, कुटुंबातील सर्वांची

काळजी या सर्व आघाड्या व्यवस्थित सांभाळते, तेव्हा पुरुषाने... पतीने तिला या सर्व गोष्टीत सहाय्य करायलाच हवे.

हे करताना तिचे मनही जपायला हवे.ती आपलं घर सोडून आली आहे आणि या घराला ती आपलं समजून सतत कार्यशील राहाते आहे, याची जाणीव घरातील प्रत्येकाला असायला हवी, पण पतीला ही जाणीव अधिक दृढतेने असायला हवी.तरच दोघांतील विश्वासाचं नातं अधिक घट्ट आणि समृद्ध होईल....खरं ना!!

    या गझलेतील मला उलगडलेला आशय मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.या गझलेतील आशयसौंदर्य हे पूर्णपणे गझलकारांचे आहे.

धन्यवाद!🙏🏻

©® सविता सामंत, गोवा.

दि. 26/01/20

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...