Followers

Friday, 15 March 2024

चंदनाची फुले - रसग्रहण 14

मनाच्या निर्मळ पणाची ग्वाही देणारा...

रसग्रहण - सुरेश बोर्डे 

एखाद्या साहित्य कलाकृतीला प्रथितयश लेखक समीक्षकांची प्रतिक्रिया बहुमोलाची असते तो बहुमान सामान्य वाचकांपर्यंत पोहोचल्याची पावती असते परंतु सामान्य रसिकांची कलाकृती विषयीची भावना कवी लेखकापर्यंत पोहचली तर रसिकांचा ही आनंद व्दिगुणित होतो असा पुर्नआनंद मिळावा या हेतुने गझलकारा कवियित्री चंदना सोमाणी यांच्या "चंदनाची फुले" या नव्या गझल कविता संग्रहाचा रसास्वाद. 

        "चंदनाची फुले" हा चंदना सोमाणी यांचा ८० पानी गझल कवितांचा संग्रह गझल प्रांतात नाव लौकिक असल्याचे गझलकारा या संग्रहातून सार्थ ठरवतात.

"पाकळी पाकळी शब्दवेडी कळी
  सांडते शायरी चंदनाची फुले"

हा शेर वाचकाला ओंजळीत ओतप्रोत गझल फुले देणार आहे असे आश्वस्त करतो आणि पुस्तक भर वाचण्यास खुणावत रहातो.  
फुलांची सुखाची अपेक्षा कोणाला नसते? त्यासाठीच तर सारी धडपड पण ते सहज शक्य आहे का? या वास्तवाचं भान गझलकारा सजगतेने व्यक्त करतात 

"किती साचले दुःख हृदयी नभाच्या
  कशा आसवांच्या निथळतात धारा"

वेदनेची जाणिवप्रगल्भतेने व्यक्त करणारा हा खयाल वाचकाला गझल कडे अधिक आकृष्ट करतो. मात्र दु:ख म्हणजेच आयुष्य नाही ही निरस भावना आयुष्य ठरू नये, जगणे सुंदर आहे अशी साद देणारा शेर तितक्याच ताकदीने गझलकारा आपल्या समोर पेश करतात... 

"अशी दूर व्हावी निराशा मनाची
  जशी ज्योत अंधार भेदून यावी"

जगण्याची उर्मी, सकारात्मकता या साऱ्याला आवाहन केले जणू. तरीही माणूस साधा सोपा मार्ग सोडून अव्यक्त मार्ग का शोधीत रहातो हे गुढाचे आकर्षण की स्वभाव धर्म? यावर सुंदर शेर 

"माणूस माणसाचा हे का कुणा कळेना
  संकल्पना सुखाची सोपीच पण रुजेना" 

मन तुटते स्वाभिमान जागा होतो गत आयुष्याची आठवण एक दिनचर्या होते आणि तो भाव गझलकारा शब्दात अचूक व्यक्त करतात 

"तुझ्या आठवांचा असा घोर माथी
  नशीबी दिवाळीच बरबाद आली" 

मनातील सल अत्यंत संयमितपणे व्यक्त करतात. खरे तर ओढ समर्पण सर्वश्रेष्ठ, जगण्याचा बंध खुला होतो निसर्गाला दानही तेच मागायचं असतं पण निसर्ग रुसला असेल तर---तर---गझलकारा अप्रतिम शब्दबद्ध करतात 

"कशी ओढ नाही धरेची नभाला
  म्हणावे तरी काय ह्या पावसाला"

इच्छा आपली असली तरी प्रतिसादही महत्वाचा तसा न भेटणं हे अधिकच क्लेशकारक, सांगता ही येत नाही आणि व्यक्त होणे हे कठीणच, पण तेच अगदी सोप्या पण मार्मिकतेने सांगणारा हा शेर 

"विवंचना ही कुणास सांगू
  माझ्या पुरता समास माझा"

मनाच्या निर्मळ पणाची ग्वाही देणारा पण इतराला सांगूनही अपेक्षा ठेवता येईल का कारण हा शेर जगण्याचे इंगित सांगून जातो 

"चुटकी सरशी रंग बदलतो
  तो जगण्याचे ढंग बदलतो"

"तुझ्या आठवांचा पुन्हा पावसाळा
  टपोऱ्या दवांचा पुन्हा पावसाळा"

या सर्वांग सुंदर गझलेने जगण्यातील समृध्दी उन-पावसाचा खेळ, मनाला नवी ऊर्जा देते आणि तरीही मनाची कासाविसी थांबत नाही कारण

"कोंडमारा होत आहे हा किती
  वादळी अंधार आहे जिंदगी" 

मनाचे सारे कंगोरे ,वेदनेचे सुख, सुखाची वेदना आणि दखल न घेणारा भवताल या साऱ्यांना मार्मिकतेने चित्रण करून जातात . आणि स्त्रीच्या वैश्विक दु:खाची आळवणी समर्थन करतात 

"कधी उंबरा जो न ओलांडला, त्या
 लुळ्या पावलांचा किती कोंडमारा"

दु:खाचे असे घाव सहन करतांना सावरायला कोणी नसते तेही एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीसाठी करायचे हा शेर त्याचा प्रत्यय देतो 

"मनास माझ्या ठेच लागुनी मी कोसळता
  सावरणारी आई बनते तुझी आठवण"


      शेवटी माणसातील मी पणाचा ऱ्हास व्हावा या सदहेतुचा शेर नोंदवल्या शिवाय लेखन सीमा करणे अशक्य आहे 

"चौकट होती अभिमानाची पार करू ना शकलो आपण
 असे कितीसे दोघांमधले क्षितिजा इतके अंतर होते"

चंदनाची फुले मनातील भावविश्वाला साद घालणारा एक अप्रतिम गझल संग्रह वाचल्याचे समाधान मिळते 
                      
 सुरेश बोर्डे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 🌷🌷

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...