Followers

Thursday, 23 November 2023

चंदनाची फुले - रसग्रहण - 10

जगण्यात आनंद फुलविणाऱ्या कविता नि गझल - 

                             रसग्रहण - मधूकर जाधव 

जगण्यात आनंद फुलविणाऱ्या कविता नि गझल

                                   मधुकर जाधव, सिन्नर 

     “चंदनाची फुले” हा सौ. चंदना सोमाणी यांचा कवितासंग्रह. फेसबुकावरील मैत्रीचे जे माणसं जोडणारे वलयं आहेत. त्यातून हा कवितासंग्रह मला भेट मिळाला. यावर भलावण वा टीका  काहीतरी लिहावं म्हणून हा प्रपंच. 

       सौ. चंदना सोमाणी ह्या नवोदित कवियित्री नाहीत. लेखक म्हणून त्यांची पहिली ओळख त्यांनी २०१६ मध्ये सुरुवात करून पहिली पुस्तिका ‘सुखदुःखाच्या वळणावर’ जगणं आनंदी कसं करता येईल यावरचं त्यात भाष्य आहे. पहिला कवितासंग्रह ‘दरवळ रातराणीचा’ २०१७ मध्ये आला. आणि ‘चंदनाची फुले’ हा २०१८ मध्ये गझल नि कविता ५८ रचनांचा दुसरा कवितासंग्रह आहे. 

       ‘मनातले....’ मनोगतात त्या म्हणतात, ‘मी फक्त लिहिते...’ ह्या ओळी बरेच काही सांगून जातात. निर्मितीचा ध्यास सातत्य ह्यात दिसून येते. मा. म. भा. चव्हाण यांनी आपल्या  मलपृष्ठावर  दोन शब्दात ‘सत्य आणि सौंदर्याचा महोत्सव’ असं म्हणून गौरविले आहे. 

       कवितेच्या प्रांतात कवितेचं बेसुमार पिकं काढलं जात आहे. हे जरी खरं असलं तरी ह्या गदारोळात कवितेला काही हक्काची दालन खुली झाली आहेत. (फेसबुक, whats aap इ.)आणि त्यामुळे कवी कविता आणि आस्वाद घेणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. एकीकडे वाचन संस्कृती लोप पावली जात आहे काय ! हा सूर आळवत असताना त्या सोशल माध्यमातून नवोदित कवी कविता घेऊन येताहेत आणि रसिकही त्यांना क्रिया प्रतिक्रया दाद देतात. हेही नसे थोडके! सध्या हा पुराचा लोंढा आहे. त्यातला पुरासा बाजूला जावून नितळ पाणी आणि तळठावं निश्चित मिळेल हा आशावाद बाळगायला काय हरकत आहे ! कवितेचा दर्जा , संख्यात्मक, गुणात्मक हे जरा बाजूला सारून कवितेचा एक नवा प्रवाह मराठी साहित्याच्या दालनात समृद्ध होत आहे. त्यांचे स्वागतच करायला हवे. दिवाळी अंकाची मक्तेदारी आणि कविता उलट टपाली परत येणे ह्याला इथं फाटा मिळाला आहे. हे तेव्हढेच खरे. 

       मराठी साहित्याचा कल्पना आणि मनोरंजनाचा ढाचा तसाच ठेवीत काही कवी कवियित्री वर्तमान प्रश्नांची कैफियत आपल्या कविता नि गझल यामधून मांडीत पारंपारिक परिघाला छेद देण्याचे काम करीत आहे. इथे कवितेच्या जाणीवा समृद्ध होताहेत. 

       सुख दुःखाच्या सीमा सरकताहेत. दुःखाची भूमिका जेंव्हा दुय्यम आणि टोकाची ठरते तेंव्हा गळ्यात दाटून आलेला उमाळा बाहेर पडत नाही. आणि डोळ्यातले अश्रूही अतीव दुःखाने आटतात. ‘अक्षरांचा लळा’ यामध्ये कवियित्री हेच टिपते, 

           उमाळा कसा ना फुटे या जिवाला
          किती कोरडा हा नदीचा किनारा (अक्षरांचा लळा पृ.१०) 

       मन आणि मनांतल प्रेम ही जोडगोळी भेटीची अपेक्षा ठेऊन जगत असते. आशा निराशेचं वादळ मनांत रुंजी घालत असतं. जेंव्हा ही गळाभेट होते तेंव्हा नकळत कवियित्री शब्द रेखाटते,

            अशी दूर व्हावी निराश मनाची
            जशी ज्योत अंधार भेदून याव (मैफिलीत पृ. ११)   

       विभक्त कुटुंब पद्धतीची रौंदळीचा इतका विपर्यास झाला आहे की ज्यांनी पोटाला चिमटे घेत आपली पिढी जोपासली ती अडगळ ठरू पाहताहेत. मग कवियित्री मर्मावर बोट ठेवीत म्हणते, 

           सुखाकारणे त्यागतो मायबापा
           कसा धाडतो पुत्र वृद्धाश्रमाला (कोरडे क्षण पृ.१४)

      माणूस हा समाजात वावरताना त्याभोवती आणिक कंगोरे राजकीय, सामजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक रिंगण करून असतात. चालू राजनीतीवर माणूस हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा कसा आहे ते ह्या कवितेत विस्तृतपणे येते,

           राजनीतिच्या नावाखाली
           रोज नवे तो चंग बदलतो

           जेव्हा सोबत नकोच ठरते
           तेव्हा आपण संग बदलतो  (माणसाचे पृ.१६)

       सगळीकडून अंधारून आलं आहे. जीवन जगण्याचा सारा कोंडवाडा होत आहे. जिंदगी डावावर लावली जात आहे. यावर कवियित्री म्हणते, 

          कोंडमारा होत आहे हा किती
          वादळी अंधार आहे जिंदगी  (जिंदगी पृ. २०)

       अत्याचारानं कळस गाठला आहे. याची शिकार होतेयं अबला स्री. तो अन्याय, ती सल ही जुलमी परंपरा कवियित्री इतिहासाचा दाखला देत चितारते, 

          ओळखीची माणसेही वागती खिल्जीप्रमाणे
           पद्मिनी जोहार सुद्धा वाटतो आता नकोसा  (सुद्धा वाटतो आता नकोसा पृ. २३)  

       ‘आहेरे’ ‘नाहीरे’ हे वास्तव कवयित्रीनं नेमकेपणाने मांडलं आहे. वंचितांची तहान म्हणजे गरीबी श्रीमंताची दरी अधिकच रुंदावते आहे. ती संपवायला इथली व्यवस्था अपुरी पडली आहे. म्हणून ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चवदार तळ्याची सामाजिक लढाई छेडली ते पाणीही चवदार नाही अशी स्पष्टोक्ती सोमाणी यांनी निर्भीडपणे व्यक्त केली आहे, 

           शमली न वंचितांची पुर्ती तहानही
           पाणी नसे तळ्याचे चवदार फारसे (फारसे पृ. २८)

       आयुष्यातील लेखाजोखा मांडताना चंदना सोमाणी यांनी एक नवीन ताळेबंद चितारला आहे. त्यामध्ये बाकी मोठे शून्य येतच नाही. हा ताळेबंद कधीच टॅली होत नाही. कुशल आणि अकुशल कर्माचा हा हिशोब असं कवियित्री स्पष्टपणे नोंदवतेय,

          सदाचारणी साठव नगद दुराचाराचा कर खर्च
          हाच खरा असेल हिशोब बाकी सारे बेहिशोब (हिशोब/    बेहिशोब पृ.६२)

चंदनाची फुले ह्या कवितासंग्रहात गझल आणि मुक्त छंदातील कवितेचा हा सुरेख आकृतीबंध आहे. कविता कमी व गझल अधिक आहेत. गझलेचा पाढा वाचताना वृत्त, मात्रा आणि  अक्षरी ह्याला हात न लावता भावलेल्या गझलांचा मनाला भिडणारा संवाद इथे मोलाचा वाटतो. तसेच कवितेचं दालन पाहताना मुक्त छंदातील कविताही उत्तम आहेत. शब्दांची ओढाताण न करता सहज भाषेतली मांडणी भावते. त्यामुळे कविता दुर्बोध होत नाही. कवितेत नवखेपण कुठेही आढळत नाही. जगण्याचं समीकरण मांडत जीवनात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या ह्या गझल आणि कविता आहेत. अजूनही कवियित्री चंदना सोमाणी ह्यांना समता विषमतेचा कॅनव्हास व्यक्त व्हायला वाव आहे. भावी वाटचालीला मंगल कामना !  

मधूकर जाधव, सिन्नर

Madhukarjadhav353@gamil.com

चंदनाची फुले 

सौ. चंदना सोमाणी 

पृथ्वीराज प्रकाशन 

३५३, नारायण पेठ, लक्ष्मी रोड, 

पुणे – ४११ ०३० 

किंमत रू. १५०.००

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...