*खुळी आस*
आज तो तिला भेटून गेला, वीस वर्षानंतर...
आलेला हुंदका तिने मोठ्या निग्रहाने परतवला. दाटलेल्या कंठाने व भरलेल्या नेत्रांनी नेत्रा घराकडे परतली, मनातील विचारांची श्रृंखला तुटत नव्हती. एकामागोमाग एक विचारचक्र सुरूच...
असे काय घडले की श्रीधर मुंबईहून नांदेड इतके लांब अंतर कापून तिला भेटायला आलेला असतांना फक्त दोन शब्दांसाठी काही मिनिटे वेळ देऊ शकला नाही. चहाचा आग्रह देखील यासाठीच की अजून काही क्षण त्याच्या सोबत घालवता यावे पण आल्या पावली का माघारी फिरला असावा....?
सारेच समजण्यापलीकडे...
असे काय कारण असेल, मान्य; त्रिवार मान्य आता आपल्या वाटा भिन्न असतील पण एक मैत्रीच्या बंधाखातर तरी बोलू शकत होताच की तो...
गतकालीन स्मृतींच्या गजबजलेल्या कोलाहलातून मन बाहेर पडायला तयार नव्हते. एक एक दृश्य चित्रपटातील चलचित्राप्रमाणे फेर धरू लागले आणि मन पुन्हा मागे गतकाळात जाऊन विसावले.
नेत्राचे घर ज्या गल्लीत होते त्याच गल्लीत श्रीधरचे असल्याने, तो खेळतानाचा पहिला स्पर्श, ती पहिली नजरानजर, त्यानंतरची ती आंतरिक ओढ, भेटी-गाठी सारे सारे आठवून कशातच मन लागेना. पुन्हा पुन्हा एकच प्रश्न समोर उभा राहत होता, का ? तो का असा वागला असावा...? हा प्रश्न फारच जीवघेणा ठरत होता. काही काहीच कळत नव्हते नेत्राला आणि जाणून घ्यायची तर ओढ लागलेली म्हणून दुसऱ्या दिवशी कारण विचारण्यासाठी तिने फोन लावला.
रिंग जात राहिली पण समोरून काहीच प्रतिसाद येत नव्हता. खूप वेळा प्रयत्न करून एकदाही फोन उचलला न जावा, जाऊ देत, काही कामात गर्क असेल नंबर पाहून वेळ मिळाल्यावर तोच पुन्हा लावेल फोन असा विचार तिच्या मनात डोकावला. परंतू असे काहीच घडले नाही उलट कितीतरी दिवस नियमितपणे फोन करून देखील उचलला गेला नाही.
काही केल्या कोडे उलगडत नव्हते...
आणि एक दिवस अचानक श्रीधरने फोन उचलला, पुन्हा फोन करू नकोस इतकेच सांगण्यापुरता...
अरे पण कारण तरी समजू दे ना?
दोन मिनिटांच्या भेटीत असे काय घडले की गेल्या सहा महिन्यात फोनवर तास तास बोलणारा तू, अचानक फोन करू नकोस असे बोलतोस...??
नंतरचे काही वेळ ती फक्त ऐकत होती आणि तिचे डोळे मृग नक्षत्राप्रमाणे बरसत होते...
ती आपले मन व्यक्त करणार तरी कसे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने फोन ठेवला सुद्धा...
आभाळ भरून आल्यावर ढग बरसल्याने आकाश निरभ्र होते तसेच मन भरून आल्यावर मोकळे होण्यासाठी शब्द रुपाने बरसणे अनिवार्य होते पण लग्नानंतर नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे शेजारीपाजारी बोलण्याची चोरी तर मित्रमैत्रिणींचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
पतिपत्नीचं नातं जोपर्यंत मनाने एकजीव होत नाही तोपर्यंत गतकालीन स्मृती पुसल्या जाणे अशक्यप्राय होते, असेच काहीसे नेत्राच्या बाबतीत घडतं होते. सततचा अविश्वास तिला श्रीधरला विस्मृतीत जाऊ देत नव्हता. त्याचे ते प्रेम तिच्या मनाला रुंजी घालायचे.
आनंदा नेत्राचा नवरा, नेत्राच्या वयाच्या दुप्पट वय तर होतेच पण दोन मुलांच्या बापाबरोबर वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे लग्न ठरले त्याच रात्री तिने श्रीधरला घरात विचारायला सांगितले पण त्याने भितीपोटी नकार दिल्याने शेवटी बोहल्यावर उभे राहण्यापलीकडे नेत्राकडे काहीच पर्याय शिल्लक नव्हता...
लग्नानंतर जे प्रेम, माया, आपुलकीची एखाद्या जोडीदाराला गरज भासते ते सुख नेत्राच्या वाट्याला आनंदाकडून न आल्याने श्रीधर तिच्या मनातून बाहेर पडलाच नाही कधी व एकदा तिच्या मैत्रिणीने लग्नाच्या वीस वर्षानंतर फोनवर श्रीधर बद्दल सांगितले व तिचे मन पुन्हा त्याच्याकडे ओढले जाऊ लागले अनैतिकतेच्या भावनेतून नव्हे तर फक्त भावनिक प्रेमापोटी, जिव्हाळ्याचे दोन शब्द ऐकण्यासाठी...
ते शब्द म्हणजे, तू कशी आहेस? तू सुखी आहेस ना तुझ्या संसारात...??
पण छे, नियती एखाद्यावर इतकी कशी रूष्ठ असू शकते कोणास ठाऊक?
नेत्राची होणारी कुचंबणा, मानसिक तसाच शारीरिक छळ, त्यांच्या वयातील अंतर, त्यात दबल्या जाणाऱ्या तिच्या भावना आणि पहिल्या प्रियकरासाठीची तिची उचल खाल्लेली भेटीची ओढ, किमान श्रीधर भेटल्यानंतर मनाचा एक नाजूक कप्पा, भावनिक प्रेमाचा रितेपणा भरून येईल असे तिला वाटत होते, भेटीनंतर या गोष्टींचा पुरता भ्रमनिरास झाला.
मन घायाळ झाले तर जखम भरून काढण्यासाठी किती वेळ जाईल सांगणे अशक्य, मारलेले घाव जातात पण मनावरील शब्दांचा ओरखडा माणसाचे खच्चीकरण करतो असेच त्या झालेल्या फोनवरील संवादाने तिचे मन खचून गेले होते. काही केल्या मनातून विचार जायला तयार नव्हते.
दिवसामागून दिवस जात होते आणि मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने तिला माहेरी जाण्याची संधी मिळाली. बाल मित्रमैत्रिणींना भेटता येईल, जीवनातील काही क्षण पुन्हा आनंदाने घालवता येईल, माहेरची ओढ जणू अंधारात एक सुखाचा कवडसा असेच काहीसे तिच्या मनाला वाटून गेले.
आयुष्यात काही गोष्टी हव्या-नको असल्या तरी जशा आहेत तशाच स्वीकाराव्या लागतात...
काही क्षणातच तिची ट्रेन स्टेशनवर पोहोचणारच होती....
माहेरच्या सुमधूर आठवणी तिच्या मनात रुंजी घालू लागल्या. त्याचप्रमाणे तिचे मन नकळत श्रीधरच्या आत्ताच्या आणि आधीच्या वागण्यातील तुलनात्मक बदल आठवता नैराश्याच्या दरीत खोल लोटलं जात होतं. मनाची नुसती घुसमट होत होती, बोजड घुसमट. हलकं होण्यासाठी मन मोकळं होणं गरजेच होतं आणि स्टेशनवर उतरताच तिला तिची बालमैत्रीण वसुधा दृष्टीस पडली, त्या रखरखत्या उन्हातही एक मंद वाऱ्याची झुळूक तिला सुखावून गेली...
श्रीधर भेटून गेल्यानंतरचा आजपर्यंतचा दाबून धरलेला हुंदका वसुधाच्या मिठीत तिने मोकळा केला.
काय गं, असे काय झाले रडायला...? वसुधाने विचारले.
ह्रदयात साठलेल्या वेदनेला सांत्वनाचा वारे लागताच अश्रू बनून ओघळू लागले.
असा नव्हता ना गं श्रीधर? नेत्रा बोलता बोलता रडू लागली. तू नंबर दिल्यानंतर गेले सहा महिने फोनवर बोलतांना म्हणायचा, तुझा तो रेखीव गोरापान चेहरा माझ्या मनात आजही तसाच त्या वहीतील गुलाबासारखा जपून ठेवलाय मी. किती सहन करतेस गं तू मला तुझे दुःख पाहवत नाही, हा खरंच त्याचा नाटकीपणा होता का गं? की फक्त प्रेमाचा मुखवटा धारण केला होता तो त्या भेटीत गळून पडला. जीवनाच्या काटेरी वाटेवर चालतांना फक्त एक त्याच्या भेटीची आस मला रोज नवजीवन जगायला भाग पाडत होती ते त्याचे प्रेम आठवून अन् त्याने असे वागावे, तुला आठवतो तो दिवस बाबा निवर्तलेला. तो दिवस माझ्यासाठी अतिशय कठीण परंतू त्याने मला दुःखातून उभारले. त्याच्या निस्सीम प्रेमाने भेटीच्या दिवसापर्यंत जगण्यास उभारी दिली. तो येणार असा फोन येताच मला स्वर्ग दोन बोट उरलेला. अतिशय आतूरतेने मी त्या दिवसाची वाट पाहिली. तो कसा असेल? कसा दिसत असेल त्यात देखील माझ्यासारखाच बदल झाला असेल का? की आजही तो पुर्वीइतकाच रूबाबदार दिसत असेल ?
परंतू भेटून गेल्यानंतरचा तो फोनवरील संवाद जीवघेणा ठरला.
मला काही आयुष्यभर त्याच्या खांद्यावर ओझे बनून राहायचे नव्हते तर जिव्हाळ्याच्या दोन बोलाची अपेक्षा बाळगली होती मी, हाच का तो श्रीधर जो माझ्यावर जिवापाड प्रेम करायचा की फक्त माझ्या तारूण्यातील देखणेपणावर...???
श्रीधरच्या एका भेटीसाठी आसूसलेली मी, आजपर्यंतच्या वेदनादायी आयुष्यातून त्याची एक वासनारहीत प्रेमळ मिठी सुखाच्या क्षणाचा एक कवडसा देईल, ह्या एका क्षणासाठी मी सारे आयुष्य वेचले. अन्याय सहन करून देखील जगले, मनात एक खुळी आस घेऊन...
आणि तो म्हणाला की तू आता पूर्वीप्रमाणे दिसत नाहीस, तुझा तो अवतार पाहून मला किळस वाटली.
मनापासून प्रेम करणारा श्रीधर कधीकाळी फक्त तिच्या सौंदर्यावर प्रेम करत होता ही गोष्ट तिच्यासाठी त्रासदायक ठरत होती. कोणीतरी आपल्यावर प्रेम करते ही भावना जशी सुखावणारी असते तसेच बाह्य सौंदर्य संपुष्टात आल्यावर ती व्यक्ती आपला द्वेष करते ही भावना क्लेशदायी ठरते. कथा, कादंबरीतून स्त्री सौंदर्याला इतके महत्त्व दिले जाते की; तिच्या शारीरिक सौंदर्यापुढे आंतरिक सौंदर्य दुर्लक्षित होते.
जगात शारीरिक सौंदर्याचे आकर्षण हीच सर्वात मोठी गोष्ट आहे का? शारीरिक प्रेमापुढे भावनिक प्रेम दर्जाहीन का ठरवले जाते...?
बाह्य सौंदर्याला इतके महत्त्व दिले जाते की मनातील कोमल भावना यापुढे अर्थहीन ठरल्या जाव्या...??
आज ना उद्या जे सौंदर्य लुप्त होणार ते शारीरिक मग चिरकाल टिकणाऱ्या अंतरंगातील मृदु-कोमल भावना, आंतरिक सौंदर्याला काहीच महत्त्व नाही का?
नात्यांची श्रृंखला स्वभावावर जोडली जावी न की बाह्य सौंदर्यावर...
वेलींवरील फुलांचा टवटवीतपणा त्याच्या पोषक तत्वांवर अवलंबून असतो, कसदार माती, पुरेसा सुर्यप्रकाश, खत व पाणी मिळाल्यावर त्याचे निर्माल्य होईपर्यंत ते टिकते, नाहीतर अकाली गळून पडते...
असाच काट्यांनी वेढलेला गुलाब होती ती...
झाकोळलेले आभाळ बरसून स्वच्छ, नितळ, निरभ्र झाले होते...
जसे तिचे मन मोकळं होऊन.......!!!
.....# चंदना सोमाणी ©® पुणे

No comments:
Post a Comment