Followers

Thursday, 23 November 2023

मराठी गझल आणि रसग्रहण - क्षण एखादा

 गझलेचे रसग्रहण - बाळकृष्ण तिराणकर 

मराठी गझल -क्षण एखादा 

तिराणकर काका पुन्हा एकदा निशब्द केलंत मला...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आदरणीय पै. इलाही सरांच्या आरशाहून मराठी गझल विश्वाला दुःखभारीत आरशाचे दुःख धुंद तरीही गंधाळ नि वेगळा आरसा दाखवणारी चंदना व माणसाच्या आयुष्यातील क्षणाक्षणावर ज्याची पकड आहे असा काळ, असा एखादा क्षण सौगात म्हणून आपल्या झोळीत टाकतो की आयुष्याला अनोखे वळण मिळते.
कालाय तस्मै नमः काळ हाच सर्वश्रेष्ठ आहे काळाने रावाला रंक नि रंकाला राव केले आहे..
या मातीने काळाला कवेत घेऊन असे अनेक आकाश स्वतःच्या कालपटात नि काळ पोटात गिळंकृत केली आहेत. तो निर्मम काळ ज्याला कुणाची तमा नाही, काळाला काळीज नाही, तो पूर्णतः  नि:संग आहे. देहहीन आहे. त्याला मानवी अवयव नाहीत. तो सार्वकालीक व सर्वजयी आहे. त्याचा देह बनला क्षणाक्षणाच्या कणाकणांनी.  अवघ्या ब्रम्हांडाला तो व्यापून आहे. मात्र  त्याचा कालातीत अदृश्य देह हा क्षण क्षण जुळवून सरकत जातो, काळाचं हे अनभिज्ञ अजेय तत्त्वज्ञान सौ.  चंदना सोमाणी गझलेत बांधू शकतात. काळाचा महिमा सांगण्यात संत महंतांनी, विचारवंत तत्त्वज्ञांनी आयुष्ये रिक्त केली समाज प्रबोधनासाठी.  एवढा गोवर्धन चंदना कृष्णासारखी काही शेरांनी एका करंगळीवर पेलते, जे सहज साध्य नाही.  त्याला चिंतनाचा आवाका मोठा असावा लागतो.
निरव शांततेचा भंग करीत अकस्मात चर्चच्या कळसावरून घनगंभीर चर्चबेल निनादते तेव्हा येशूच्या सुळावरील यातनांचा नि त्याच्या खिळे ठोकलेल्या जखमातून वाहून साकळलेल्या रक्त कणांच्या वेदनांचा दर्दभरा वास्तव-भास मन विदीर्ण करून जावा, एवढी एखाद्याची चिंतनशीलता ही प्रज्ञेच्या पलिकडील "तथाता"
या स्थितप्रज्ञ-समानुभूतीची असावी लागते, तेव्हाच काळाचा वेध घेता येतो. त्याच्या अंतरंगात अंमळ डोकावता येतं. 
मानवी आयुष्य व देह हा पळ, क्षण नि श्वास  निश्वास यांनी युक्त आहे. हे सारं संपृक्त होतं तेव्हा सारं संपून जातं.
आज सर्वांना माहीत असणारं वास्तव माणसे नजरेआड करतात. जीवनाची आपापली वाट चोखाळत राजमार्ग शोधत असतानाच संपून जातात. वाटेवर झडलेल्या फुलांच्या पायघड्या असतात, तर पुढे संपूर्ण मार्ग बाभूळबनातील कंटकांनी व्यापलेला असतो. कभी खुशी कभी गम.
अवघं आयुष्य सोसताना, पोसताना, सांभाळताना असा एखादा क्षण येतो की ज्याची अपूर्वाई कालातीत असते. तो क्षण वर्तमान नि भावी आयुष्य व्यापूनही उरतोच. हा अनुभव सर्वकालिक आहे आणि याच्या अगदी उलट, असा एखादा क्षण येऊन जातो की अवघ्या जिंदगीची माती करून जातो. अस्तित्व संपवून टाकतो. यापूर्वीचा गंधित दरवळ तो समर्थ बलवान क्षण एका वादळ फुंकरीत संपवून टाकतो. होत्याचं नव्हतं करून जातो म्हणून चंदनाची प्रज्ञा शेर पाझरते ---

आयुष्याला पुरून उरतो क्षण एखादा
होत्याचेही नव्हते करतो क्षण एखादा 

काळ कधीच खोटे वागत नाही.  फक्त तो सरतो, सरकतो तसा  असत्याचे आवरण फाडीत जातो. अन त्याचेच अभिन्न अंग असलेला एखादा चुकार व टूकार क्षण खोटा ठरतो. पण त्यालाही दोष देता येणार नाही कारण त्यामागेही मानवी कृत्याचा सम्यक कार्यकारण भाव असतो.

फाटत जातो बुरखा टरटर सत्याचा अन् 
म्हणता म्हणता खोटा ठरतो क्षण एखादा

आयुष्याच्या ग्रंथात आपल्याच नोंदी असतात आपल्याच पाऊलखुणा उमटत जातात. काही चटोर, काही कठोर , काही कमी, काही जास्त, काही छोटी, काही मोठी, काही लिहूनही कोरी, काही पानांवर व्यथा, काहींवर कथा, काही वेदना, काही संवेदना , काही सुखाने भारलेली तर काही दुःखाने घेरलेली अक्षरे उमटत जातात. काही पाने व्यवधानाने तर काही अनावधानाने कोरी राहतात. कधीकधी मागील सारी पाने भरून गेली असावी असे वाटते पण आज वरचा आपला अवघा ग्रंथ कोरा राहिला हे नंतर जाणवतं.  वाघावर आरूढ होऊन येणाऱ्या चौदाशे वर्षे वयाच्या चांगदेवांनी दिलेला कोरा कागद पाहून त्यांच्या ज्ञानाचा कोरेपण दाखवून देणारी मुक्ताई मला चंदनाच्या रूपात दिसते. असा एक क्षण येऊन धडकतो की आयुष्याचा अवघा ग्रंथ क्षणात भरून जातो. हा अनुभूतीचा नि समानुभूतीचा प्रकार आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.

कोरी पाने उलटत गेली भरली नव्हती
शेवट सारी पाने भरतो क्षण एखादा

एकट्या दुकट्यालाच नाही तर कधीकधी सकल जगाला अचंबित करणारा एखादा क्षण येऊन जातो. क्षणात सुरू झालेले वादळाचे  विप्लवी तांडव सारे काही नेस्तनाबूत करून जाते क्षणात आलेल्या एका त्सुनामीने.  ज्याची स्वप्नातही कल्पना नसावी असे काहीतरी घडून जाते क्षणात आयुष्य वळण घेते निर्धाराचे नि नरेंद्रातून विवेकानंदांचा जन्म होतो. निर्णयाचा एकच क्षण, दुःख मुक्तीच्या विवंचनेने भारलेला कुणी राजकुमार सिद्धार्थ "तथाता" मार्गावर क्रमण करतो. मोहाचा एकच क्षण निर्धाराने टाळतो आणि गौतमाचा बुद्ध होतो.  झाडाला वाटलेही नव्हते असे घडेल पण ते घडले. हे सारे ज्यात अंतर्भूत आहे तो शेर चंदना लिहिते---

माझी नाही तुमची नाही साऱ्यांचीही
क्षणात एका गफलत करतो क्षण एखादा

आपण जे अपेक्षिलेले नसते माणसांचे सर्व आडाखे, अंदाज चुकवणारा असा एखादा फसवा क्षण.
आपल्याच माणसांनी केलेली फसगत, वंचना त्यातून निर्माण होणारी वेदना या वेदनेच्या यातना आपले अंतर्बाह्य अंगांग घेरून टाकतात. सुटकेचा एक उसासा ही न घेऊ देता जिवंत मरणाचा अनुभव. पण अचानक घनतम चिरणारी एक वीज अंतरात चमकावी, तिचा लोळही विरावा न विरावा तोच घनांदकारावरचा तिचा प्रहार आपल्या समस्त दुःखांना क्षणार्धात दूर सारतो नि तो एखादा क्षण त्या शतक्षत विव्हल लाव्हातप्त काळजावर एक सुखेरी फुंकर घालून मनाला शीतलता प्रदान करून दुःख मुक्त करतो.
कळीकाळालाही त्याचेच एक अभिन्न अंग असलेला एखादा क्षण किती हळवा आहे हे कळत नाही त्याच्याच अंतरात तो सामावलेला असूनही. ज्यावर मानवी गुणांचे आरोपण झाल्यासारखा सुखात हसतो, दु:खात रडतो नि काही वेगळे दिसताच बावरतोही, एखादा क्षण असाही बावरतो हे काळालाही कधी कधी कळत नाही ही गंमत. त्याचं तप्त मन मानवी मनावर फुंकर घालणंही नियतीच नियोजन.
शेवटी शेवटी अंताची चाहूल लागते माणसाला. आता आपला प्रवास संपायला आला, मुक्कामाचे ठिकाण आल्याचा वास्तव- भास अनामिक भीतीने घेरून टाकतो माणसाचे अवघे अस्तित्व. डोळे ताठरतात,  मन अनंताचा वेध घेते. मेंदू जागा आहे आठवांचे रसायन मेंदूला पुरवणार्‍या पेशींची अस्तित्वगामी घाबरी पळापळ सुरू आहे, काय आवरावे ? नि काय सावरावे कळत नाही. मन:पटलावर एकेक घटना चलचित्रासारख्या सरकत  आहेत. माणसे,  घटना, मान-अपमान, पैसा, कीर्ती, यातना, विवंचना, वंचना, फसगत, दगे देणारे सगे सारं सारं आठवतं जातं माणसाला अंतिम क्षणी निमिषार्धात. तो एकच क्षण. कदाचित शेवटच्या श्वासाचा अमूर्त अंतिम साक्षीदार. तो अंतिम क्षण पैलतटीच्या मोहक मुक्तीच्या सादेने मोहरून जातो. हा आशय घेऊन चंदना लिहिते---

पैलतटावर धुन मृत्यूची ऐकू येता
ऐलतटावर मग मोहरतो क्षण एखादा

जे शक्य नाही त्याचाही वेध घेण्याची गुर्मीगर्भित भाषा मानवी मन बोलू लागते. त्याचं ते खुजेपण त्याला दाखवून देण्यासाठी कर्तव्य परायण चंदना लिहिते---

मीच थोपवू शकतो केवळ सूर्यालाही
तशाच केवळ भ्रमात हरतो क्षण एखादा

भ्रमाचे पांघरूण ओढून फसवा क्षण बाजी हरतो. भ्रम आणि वास्तव याचा अन्योन्य संबंध ज्ञानदेवांनी दोरी आणि साप या रुपकाने ज्ञानेश्वरीत वर्णिलाच आहे. चंदना-मुक्ताई हे भान पुन्हा माणसाला देते.

शुभाशिर्वादासह बाळकृष्ण तिराणकर 

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...